शेतमजुराच्या खुनातील आरोपी पाच दिवसांत केले जेरबंद
पैठण एमआयडीसी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई
विलास लाटे/ पैठण : धारदार शस्त्राने वार करून संदीप साळवे (वय २५, रा.औरंगाबाद) या शेतमजूराचा शेतवस्तीवर खून केल्याची घटना ढोरकीन-दिन्नापुर रस्त्यावर ढोरकीन शिवारात शनिवारी (दि.११) रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ राधाकिसन साळवे यांच्या फिर्यादीवरून पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासचक्र वेगाने फिरवले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील यातील आरोपीचा शोध घेत होते. तपास करत असताना पोलिसांना काही धागेदोरे हाती आले. त्यावरुन संजय मन्साराम चव्हाण (वय २६, रा.टाकळी शिवार) या संशयितांस ढोरकीन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सदर शेतमजूर तरुणाचा खून साथीदार भाऊ मुकेश उर्फ बाळू चव्हाण (वय २२) याच्या मदतीने केल्याचे पोलिसांसमोर कबुल केले. त्यास पोलिसांनी टाकळी शिवारातुन पळून जात असताना मोठ्या शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोंबड्या व बकरी चोरण्यासाठी किरण पेरकर यांच्या शेतातील आखाडयावर गेले असता ते चोरी करून परत जात असतांना त्यांना मयत संदिप साळवे याने बघितले त्या आरोपींना रोखण्यासाठी प्रयत्न केले असता त्यास तीक्ष्ण व बोथट हत्याराने मारहाण करुन जीवे ठार मारले. असे आरोपीने कबूली जबाब दिला आहे. सदर कामगिरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष खेतमाळीस, फौजदार दिलीप चौरे,राहूल भदरगे,राहूल बचके,राजेश चव्हाण, दिनेश दाभाडे आदींनी संयुक्त तपास करून गुन्हा उघडकिस आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.