सरपंच सचिन पालवे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार – प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सन्मान

अहिल्यानगर : ग्रामविकासाच्या दिशेने सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे उदरमल-सोकेवाडी ग्रामपंचायतीचे युवा सरपंच सचिन पोपटराव पालवे यांना “राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या विशेष समारंभात 13 एप्रिल 2025 रोजी अहिल्यानगर येथील माऊली संकुल येथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवक मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना अनासपुरे म्हणाले, “सरपंच हा गावाचा खरा पालक असतो. गावच्या विकासासाठी जल, जमीन आणि झाडे या तीन घटकांवर भर देणे गरजेचे आहे. खेड्यांचा विकास हाच देशाचा विकास आहे आणि यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे.”
कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक यादवराव पावशे यांनीही सरपंचांच्या भूमिका आणि मेहनतीचे कौतुक करत सरकारकडे मानधन वाढीची मागणी केली. “कोट्यवधी रुपयांची कामे प्रामाणिकपणे मार्गी लावणाऱ्या सरपंचांना कमी मानधन मिळते, ही खरोखरच खेदजनक बाब आहे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, एकनाथराव ढाकणे, युवा नेते रोहित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकासासाठी सचिन पालवे यांचे कार्य निश्चितच इतर सरपंचांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.