कृषी
कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील शेतकऱ्याच्या बांधावर
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील युवा उद्यान पंडित राहुल रसाळ यांच्या प्रयोगशील शेतीस भेट देऊन त्यांनी अवलंबलेल्या नाविन्यपूर्ण शास्त्रीय आधुनिक शेती पद्धती विषयी जाणून घेतले. यावेळी त्यांचे सोबत त्यांचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते.
यामध्ये बायोस्लरी संयंत्र ते शेतामध्ये पिकास देण्याची यंत्रणा, द्राक्ष पिकात लावलेली भूमिगत सिंचन पद्धती, करटोली पिकाची द्राक्षा मधील लागवड, कारली पिकाची लागवड, स्वयंचलित हवामान यंत्र आणि त्याद्वारे केले जाणारी पाणी आणि खत व्यवस्थापन, कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणीचे वेळापत्रक इत्यादी बाबींची पाहणी केली. रसाळ यांची बांधावरची प्रयोगशाळा आणि त्यातील ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन याची माहिती कुलगुरूंनी घेतली.
विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या कृषी पारायण या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होण्याची विनंती रसाळ यांना कुलगुरूंनी केली तसेच रसाळ यांची विद्यापीठातील जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यास मंडळावर नेमणूक करत असल्याची बाब अवगत केली. रसाळ यांचे प्रगतशील शेतीचे प्रयोग विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यास प्रेरणादायी ठरतील असा आशावाद कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला. शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे कुलगुरू डॉ. पाटील यांचे शेतकरी, कर्मचारी आणि अधिकारी स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.