ठळक बातम्या

विविध विकास कामांचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : पुढील महिन्यात महसूल विभागाच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना घरपोहोच मोफत सातबारा देणार असून सर्वांनी तो बारकाईने बघून त्यात काही चुका असल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.श्रीरामपूर तालुक्यात हरिगाव उंदीरगाव नाउर रस्त्याचे मजबुतीकरण, ई पिक पाहणी शुभारंभ तसेच श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा नियीजन समिती व आ.निधीतून उभारलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच १०० ऑक्सिजन बेड विस्तारित कोविड वार्ड व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ऑनलाईन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सहभागी झाले होते. तर व्यासपीठावर आ.लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अरुण नाईक, इंद्रनाथ थोरात, ज्ञानदेव वाफारे, अशोक कानडे, डॉ वंदना मुरकुटे, संजय छल्लारे, सुधीर नवले, बाबासाहेब दिघे, डॉ योगेश बंड, डॉ मोहन शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकरी हिताचे अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकार घेत आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरील अनेक अनावश्यक नोंदी काढल्या जाणार आहेत.सातबारासोबत ८ अ देखील ऑनलाईन मिळणार आहे. सातबाऱ्यावर जे काही व्यवहार होतात त्यावेळी त्याला फेरफार पडतो. त्यावर क्लिक केले की नंतर ते सर्व फेरफारही ऑनलाईन मिळणार आहे. खरेदीखताची नोंदही महिन्याभरात कशी होईल याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ई पिक पाहणी उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यामध्ये कोणत्या भागात कोणते पिक कमी जास्त आहे. याचा गोषवारा उपलब्ध होणार आहे. आ.लहू कानडे यांच्या दूरदृष्टीतून श्रीरामपूर तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारची विकास कामे झाली आहेत. येथे त्यांनी उभारलेले कोविड केंद्र हे जिल्ह्यातील एक क्रमांकाचे कोविड केंद्र ठरणार आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन टँकर जिल्ह्याबाहेर जात असताना आपण सर्वांच्या मदतीने रोखला. आरोग्य विभागातील सर्वानीच चांगले काम केले. लोक आमच्या सोबत फोटो काढतात. आज मी स्वत: आरोग्य सेवकांबरोबर फोटो काढल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आ.लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका नव्हती, कोरोना काळात अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जायचे, गरिबांना स्वस्तात उपचार मिळत नव्हते, ऑक्सिजन नव्हता म्हणून आपण पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, विस्तारित कोरोना ऑक्सिजन बेड असलेला वार्ड उभा केला.नगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामे करण्यासाठी ५ कोटींचा निधी दिला आहे. दरम्यान उंदीरगाव येथेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हरिगाव उंदीरगाव नाउर रस्त्याचे मजबुतीकरण व ई पिक पाहणीचा शुभारंभ झाला. अध्यक्ष म्हणून ऑनलाईन संदेश देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, तिसरी लाट येउच नये, सर्वांनी काळजी घेतली तर येणार नाही. मात्र आपण निष्काळजीपणे वागलो तर ती येईल, आल्यास नगर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सक्षमपणे मुकाबला करेल. श्रीरामपूर येथे उभारलेला ऑक्सिजन प्रकल्प व कोविड केंद्र हे राज्यातील एक आदर्श केंद्र ठरेल. प्रास्तविक भाषणात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले म्हणाले की, दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ३लाख २५ हजार रुग्ण सापडले मात्र त्यापैकी ३ लाख दहा हजार रुग्ण बरे झाले तर ६५०० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्याला ऑक्सिजन मिळाला नसता तर अनेक लोक दगावले असते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात १४ ठिकाणी २२ कोटी रु खर्चून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले. तर जिल्हा नियोजन विभागातून १४३ कोटी रु.कोरोनासाठी वापरले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत २६ लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत.

Related Articles

Back to top button