कृषी
कापूस खरेदी केंद्रे सुरू करा
राहुरी : कापसाला सरकारचा ५८२५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव असल्याची माहिती असुनही शेतकरी नाईलाजाने आपले पांढरे सोने कमी भावाने व्यापार्याला विकत आहे.शेतकर्यांना योग्य भाव मिळावा यासाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना आज राहुरी तालुक्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
राहुरी हा कापसाचे मोठे क्षेत्र असलेला तालुका आहे.आधीच कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.यामुळे कापुस पिकांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न पाहिली होती.मात्र दुर्दैवाने यंदा तालुक्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.दुसरीकडे सरकारचा ५८२५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव असल्याची माहिती असुनही शेतकरी नाईलाजाने आपले पांढरे सोने कमी भावाने व्यापार्याला विकत आहे.ज्यांची पिके वाचली,त्यांच्या कापसालाही व्यापारी संगनमताने कवडीमोल भावाने खरेदी करुन भरदिवसा लुटत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे आहे.अशावेळी शासनाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.यासाठी हमीभावाने शेतकऱ्यांना कापसाचा मोबदला मिळावा.म्हणुन शासनाने राहुरी तालुक्यात तातडीने कापुस खरेदी केंद्रे सुरू करावे.सदर कापूस खरेदी केंद्रे चालू न केल्यास क्रांतीसेनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.या आशयाचे निवेदन देताना क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,संघटक जालिंदर शेडगे,श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे,शिलेगावचे माजी सरपंच रमेश म्हसे,रत्नकांत म्हसे,सुनिल काचोळे,सुरेश देवरे,पप्पु हरिश्चंद्रे, भाऊसाहेब पवार,गंगाधर पवार, सागर पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.