अहिल्यानगर

येत्या मंगळवारी प्रभाग ४ मधील आठवडे बाजार बंद

श्रीरामपूर [प्रतिनिधी] : शिरसगावचा बंद केलेला आठवडे बाजार प्रभाग ४ आशीर्वादनगर भागात भरायला लागला. काही महिने प्रचंड गर्दीत चालू होता. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व कॉलेजरोड या मुख्य रस्त्यावर भरत असल्याने रहदारीस फार मोठा अडथळा निर्माण झाल्याने व अपघात होण्याची शक्यता असल्याने या भागातील अनेक तक्रारी तहसीलदार, प्रांताधिकारी व नगरपालिका व पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर एका मंगळवारी नगरपालिका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून आठवडे बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे बाजारकरू यांनी आपली जागा बदलली व शिरसगाव इंदिरानगर रस्त्यावर पूर्ववत बाजार सुरु केला.


या व गेल्या मंगळवारी नगरपालिकेच्या सूचनाला न जुमानता परत आशीर्वादनगर भागात प्रचंड गर्दीचा बाजार भरला होता. याबाबत या भागातील नगरसेवक प्रकाश ढोकणे त्याचप्रमाणे तहसीलदार श्रीरामपूर यांना कळविल्यानंतर लगेच नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे यांना कळविण्यात आले. त्याप्रमाणे श्रीरामपूर नगरपालिका कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाठविले व प्रत्येक बाजारकरू यांना पुढच्या मंगळवारी प्रभाग ४ शिरसगाव इंदिरानगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसू नये, बसल्यांस दंडात्मक कारवाई पोलीस समवेत करण्यात येईल, अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे सर्व बाजारकरू यांचे व्हिडीओचित्रण करण्यात आले. सोशल डीस्टेन्स न पाळता बाजार भरतो व रहदारीस अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर गेल्या मंगळवारी दोन दुचाकीचा अपघात झाला होता. तसेच कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहक हेही आता काही होत नाही कोरोना महामारीची भीती संपली या हेतूने बिनधास्त बाजारात येतात.

नगरपालिकेच्या मंडइचे नुतनीकरण पूर्ण झाले असल्याने भाजीपाल्याचे विक्रेते यांनी नगरपालिकेच्या रस्त्यावर बसू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सूचना वृत्तपत्रातून दिलेली असताना त्याची कोणीही दखल घेत नाही. नागरिकांची मागणी केल्याप्रमाणे येत्या मंगळवारी बाजार भरण्या अगोदर नगरपालिकेचे कर्मचारी सकाळीच उपस्थित राहून बाजार भरणार नाही याबाबत योग्य ती काळजी घेणार आहेत. तहसीलदार, प्रांताधिकारी, नगराध्यक्षा, नगरपालिका, पोलीस विभाग यांनी संयुक्त रित्या बाजार न भरणे साठी कारवाई केल्यास शासनाच्या कोणत्याही आदेशाची पायमल्ली होणार नाही व नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. तशा सूचना संबंधिताना देण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button