क्रीडा

यशाबरोबरच अपयशसुध्दा खिलाडूवृत्तीने स्विकारा – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयोगी पडतील असे गुण विकसीत होतात. क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे संघभावना जागृत होते, अंगमेहनत झाल्याने शरीर सृदृढ होते, नेतृत्वगुण वाढीस लागतात, नियोजनाची कला वृधींगत होते, चारित्र्यसंपन्नता वाढीला लागते. याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात होवून व्यक्तीमत्वाचा विकास होतो. खेळाच्या स्पर्धेत सर्वांनाच यश मिळतेच असे नाही. तुम्हाला अपशय सुध्दा तितक्याच खिलाडूवृत्तीने स्विकारता आले पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील क्रीडा भवनात दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, काष्टी येथील कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विजू अमोलिक, विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बोडखे, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महाविरसिंग चौहान, माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शरद पाटील, माजी क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, स्पर्धेचे पंच प्रा. आदिनाथ कोल्हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. दिलीप पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जीवनात सर्व गोष्टींचा समतोल असला पाहिजे. विद्यार्थी जीवनात मेरीट तसेच गुणांबरोबरच समाधान, आनंद, कला, खेळ हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. खेळाच्या मैदानावर पहिल्या नंबरबरोबरच शेवटचा नंबरसुध्दा स्विकारण्याची तयारी हवी असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. साताप्पा खरबडे यांनी खेळामध्ये संघभावना महत्वाची असल्याचे सांगितले. यावेळी या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणार्या निवड समितीच्या सदस्यांचा तसेच स्पर्धेचे पंच प्रा. आदिनाथ कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. महाविरसिंग चौहान यांना मिळालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक या पुरस्काराबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या क्रीडास्पर्धेसाठी विद्यापीठाच्या वैद्यकीय सेवेबरोबरच राहुरीच्या रोटरी क्लबनेही वैद्यकीय सेवा पुरविली आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब भिंगारदे यांनी खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आनंद चवई यांनी मानले. याप्रसंगी पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, पदव्युत्तर महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे, सर्व सहभागी महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक, समित्यांचे सदस्य आणि विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button