कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेळीपालनावरील तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वीत शेळी सुधार प्रकल्पांतर्गत शेळीपालकांसाठी शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली शेळी सुधार प्रकल्पामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, डॉ. दिलीप देवकर, डॉ. उल्हास गायकवाड व डॉ. अमर लोखंडे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. दिनकर कांबळे मार्गदर्शनात म्हणाले की, शेतकर्यांना विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळीपालन व्यवसाय किफायतशीररित्या करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. व्यवसाय म्हणून शेळीपालन केल्यास त्यापासून शाश्वत उत्पादन शक्य आहे. यावेळी प्रास्ताविकात प्रशिक्षण समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी शेळीपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शाश्वत व व्यावसायिक शेळीपालानाबाबत तसेच नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी हेतूने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. आजपर्यंत 23 प्रशिक्षण वर्गाद्वारे 884 प्रशिक्षणार्थीनी लाभ घेतला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. उल्हास गायकवाड, डॉ. महेंद्र मोटे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. दिलीप देवकर, डॉ. संदीप लांडगे, डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, डॉ. रविंद्र निमसे, डॉ. विष्णू नरवडे इत्यादी शास्त्रज्ञांनी शास्त्रोक्त पद्धतीने पैदास, आहार व आरोग्य व्यवस्थापन, पशुधनासाठी चारा व्यवस्थापन तसेच शेळीच्या दुधाचे गुणधर्म व मूल्यवर्धन, अझोला व गांडूळखत निर्मिती यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. राहुरी येथील पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.संतोष पालवे यांनी शासनाच्या शेळीपालनासाठी असलेल्या विविध योजना व प्रकल्प आराखडा तयार करण्यासंबंधी प्रशिक्षणार्थींना प्रगल्भ मार्गदर्शन करून अवगत केले.

प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पुस्तिका व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर लोखंडे व आभार प्रदर्शन डॉ. उल्हास गायकवाड यांनी केले. सदरच्या प्रशिक्षणात एकूण 56 प्रशिक्षणार्थीनी भाग घेऊन शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावरचे प्रशिक्षण पूर्ण केलेे. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रा. महेश तनपुरे, श्री. बोरकर, संदीप पवार, गौरव घोलप, रमेश कल्हापुरे, अजय गुलदगड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button