अहमदनगर

मुंबई बाबत जरांगे पाटील सांगतील तोच अंतिम आदेश – मराठा एकीकरण समितीचा निर्णय

तालुका प्रशासन व मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न

राहुरी – आज तहसील कार्यालयात मराठा समाज बांधवांची बैठक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस तहसीलदार चंद्रजित राजपूत, नायब तहसीलदार दळवी मॅडम, सहाय्यक पो.नि.वाघ, गुप्तचर विभागाचे पो.कॉ. अशोक शिंदे, पो.कॉ.रोहकले आदींच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.

महसूल प्रशासन व पोलीस यांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सरकारला दि. २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिलेली आहे. याच विषयास अनुसरून सरकारी यंत्रणा यांनी मराठा आंदोलकांचा धसका घेतला आहे कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दि.२४ डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली असल्या कारणाने राहुरी तालुक्यात मराठा सामाज बांधवांची काय भूमिका असणार यासाठी प्रशासनाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती.

या चर्चेत मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, अण्णासाहेब तोडमल, विनायक बाठे, संदीप गाडे, राजेंद्र लबडे, रोहित नालकर, विक्रम मोढे आदींनी सहभाग नोंदविला होता. यावेळी तहसीलदार राजपूत म्हणाले कि, राहुरी तालुक्यात कुणबी नोंदणी शोधण्याचे काम चालू आहे. आता पर्यंत अनेक नोंदी सापडलेल्या आहेत. कुणबी नोंदी विषयात काही अडचणी असल्यास मराठा बांधवांनी महसूल प्रशासनाला संपर्क साधण्याचे अवाहन श्री.राजपूत यांनी केले आहे.

यावेळी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, मराठा आरक्षण आंदोलन राहुरी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने सुरु आहे. सरकारने कुणबी नोंदी शोधण्याचा निर्णय घेतल्याने मराठा आंदोलनाचे मोठे यश आहे. त्याचप्रमाणे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचा जो अंतिम निर्णय देतील तो अंमलात आणला जाईल.

मराठा आरक्षण आंदोलनातील सदस्यांना बैठकीस बोलवून पो.नि. संजय सोनावणे उपस्थित न राहिल्याने ते मराठा आंदोलनाबाबत गंभीर नसल्याचे दिसत असल्याचे बोलले जात आहे.

दि.२४ डिसेंबर नंतर मराठा आरक्षण आंदोलना बाबत निर्णय न झाल्यास श्री. जरांगे पाटील यांनी चलो मुंबई बाबत निर्णय दिलाच तर राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावागावांतून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जातील, मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय काय येतो याच्या प्रतीक्षेत आहेत असे लांबे पाटील म्हणाले.

कुणबी प्रमाणपत्र काढतांना आर्थिक लुट केली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई करण्याची मागणी देवेंद्र लांबे पाटील यांनी केली.

या बैठकीस मराठा एकीकरण समितीचे मधुकर घाडगे, कैलास तनपुरे, मनोज जाधव, अविनाश क्षीरसागर, डॉ.विजय मोटे, प्रदीप झुगे, अशोक तनपुरे, अशोक कदम, दिपक चव्हाण, संभाजी कणसे, रवींद्र तनपुरे, रेवन्नाथ धसाळ, रवींद्र कदम आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button