अहिल्यानगर

महायुती सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्वरित सरसकट कर्जमाफी करावी – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. त्यातच शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतीवर वाढता आर्थिक ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी केलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा त्वरित पूर्ण करावी, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.

लांबे पाटील म्हणाले, “चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने फेब्रुवारी महिन्यातच विहिरी आणि बोअरवेलचा पाणीसाठा संपुष्टात आला आहे. यामुळे शेती उत्पादन घटले असून, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. बँका, सोसायट्या आणि पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य नाही. महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन मते मिळवली. त्यामुळे आता सत्तेत आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक न करता तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.”

महायुती सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या या ज्वलंत मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लांबे पाटील यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी त्वरित कर्जमाफीसह नवीन कर्ज पुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button