अहिल्यानगर
प्रसार माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करणे गरजेचे- महंत ह.भ.प. रामगिरी महाराज
राहुरी प्रतिनिधी : संपूर्ण देश कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर असून प्रत्येकाने कोरोना विषाणू कायमचा हद्दपार करण्यासाठी सतर्क राहावे, यासाठी पत्रकारांनी प्रसार माध्यमातून अधिक प्रभावीपणे समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी सरला बेट मठाधिपती महंत ह.भ.प. रामगिरी महाराज म्हणाले.
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ राहुरी तालुका यांच्या वतीने कोरोना काळामधील उत्कृष्ट कामगिरी बजावणार्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सोमवारी गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे,प्रांताधिकारी दयानंद जाधव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,तालुका आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड,अभियंता धिरज गायकवाड,नायब तहसीलदार गणेश तळेकर,देवळाली नगर पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे आदी मान्यवरांची होते.
पुढे बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, कोरोना ही जागतिक आपत्ती असून यामध्ये आरोग्य विभाग,सफाई कर्मचारी,महसूल विभाग,अंगणवाडी सेविका यासह पत्रकारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवले आहेत.हा पुरस्कार सोहळा माझ्या नजरेतून आदर्श सोहळा असुन हा क्षण कायम लक्षात राहील असे यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.याप्रसंगी बोलताना डॉ.उषाताई तनपुरे म्हणाल्या की,कोरोना काळामध्ये या योद्ध्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन समाजाची सेवा केली. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यात करोना थांबवण्यात यश मिळवले म्हणूनच तालुक्यात आज कोरोनाचा प्रभाव अतिशय कमी आहे.या सर्व योद्ध्यांच्या कार्याचा मला अभिमान आहे. त्यांचा गौरव करणे हे माझे भाग्यच असल्याचे डॉ उषाताई तनपुरे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे तर प्रास्ताविक श्रीकांत जाधव यांनी केले तर अध्यक्षीय सूचना बाळासाहेब कांबळे यांनी व आभार महाराष्ट्र ग्रामीण पञकार संघाचे राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश येवले,शरद पाचारणे,ॠषी राऊत, संदीप पाळंदे, कमलेश विधाटे, जावेद शेख, राजेंद्र आढाव लक्ष्मण पटारे, संतोष जाधव आदींनी प्रयत्न केले.