अहिल्यानगर

पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्याला मिळावे – माजी खा. प्रसाद तनपुरे

राहुरी प्रतिनिधी : आगामी काळात पाण्याचे संकट पाहता नवीन पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे बनले असून, त्यासाठी समुद्राकडे जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यातील तुटीच्या क्षेत्रात वळवणे आवश्यक बनले असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले. 

     नगर जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या प्रेरणा पतसंस्थेच्या आंबी येथील स्थलांतरीत शाखेचा उद्घाटन सोहळा  मा खा प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजीराव कोळसे होते.मा खा तनपुरे म्हणाले की, पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात दिल्याने मुळा व भंडारदरा धरणाच्या क्षेत्रासाठी पाच टीएमसी हून अधिक पाणी उपलब्ध होईल. सध्या आघाडीचे सरकार हे पूर्णकाळ करेल असा विश्वास असल्याने जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने लक्ष घालून आपण स्वतः यात पाठपुरावा करीत आहोत.पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडील तुटीच्या खोऱ्यात प्राधान्यक्रम देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले. जाण असलेले नेतृत्व असेल तर गावचा विकास होण्यास मदत होते. १९८०  च्या काळात नगर, एमआयडीसी आदी ठिकाणी मुळा धरणातून पाणी नेले गेले. त्यावेळीच आपण लक्ष घालून राहुरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लावल्या. मुळा नदीकाठच्या गावांसाठी सहा केटीवेअरचे प्रश्न मार्गी लावले. आज त्याचा सर्वांना प्रत्यक्ष लाभ होत आहे, याचा मला आनंद होत आहे . दूरदृष्टी नसती तर हे शक्य झाले नसते. आज समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे अनेक बाबींवर निर्बंध आले आहेत असेही तनपुरे म्हणाले. शेती, शेतकरी संकटात आहेत, पाणी असेल तर गाव समृद्ध होईल. गावाच्या विकासात संकटकाळी पैशासाठी प्रेरणा पतसंस्थे सारख्या संस्था पुढे आल्या आहेत. त्या माध्यमातून स्वतःचा, शेतीचा व गावाचा विकास होऊन गाव समृद्ध होईल. प्रेरणा पतसंस्थेचे ग्रामीण भागातील कार्य  कौतुकास्पद असून शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे व्यावसायिक, व  ठेवीदारांच्या विश्वासावर प्रेरणा समूह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे ! असेही गौरवोद्गार श्री तनपुरे यांनी काढले. यावेळी प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे म्हणाले की, नगर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या प्रेरणा पतसंस्था दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. स्वच्छ व प्रामाणिक सेवा देण्याचे काम प्रेरणा पतसंस्था करत आहे. संस्थेच्या एकूण ५५  कोटी रुपये ठेवी असून आंबी सारख्या ग्रामीण भागामध्ये संस्थेच्या ७ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. यात ठेवीदार, सभासद यांचा मोलाचा वाटा आहे, असे सुरेशराव वाबळे यांनी सांगितले.
         या कार्यक्रमासाठी  पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशराव निमसे, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चोथे, वैष्णवी पतसंस्थेचे अशोकराव थोरे,आंबी च्या सरपंच संगीताताई साळुंके, आंबी सेवा संस्थेचे अध्यक्ष विष्णू जाधव, अमळनेर सेवा संस्थेचे अध्यक्ष उद्धव कोळसे, अमळनेरचे सरपंच विजय डुकरे, उपसरपंच किरण कोळसे, राहुरी बाजारसमिती संचालक वसंतराव कोळसे,आदर्श पतसंस्था संचालक बाबासाहेब वाळुंज, कुंडलिकराव खपके,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विलासराव गागरे, नानाभाऊ कोतकर, वेणूनाथ कोतकर,राहुरी नगरपालिकेचे दशरथ पोपळघट, विलास तनपुरे ,व्हा. चेअरमन मच्छिद्र शिंदे,प्रेरणा मल्टिस्टेट व्हा. चेअरमन विष्णुपंत वर्पे, प्रेरणा वि का से चे व्हा चेअरमन अशोक उर्हे व संचालक कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन गायत्री म्हस्के तर आभार द्वारकानाथ बडधे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button