अहिल्यानगर

निस्वार्थीपणाची शिकवण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मिळते : डॉ. प्रमोद रसाळ

राहुरी विद्यापीठसमाजसेवेचे बाळकडू राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. यामुळे स्वयंसेवकांमध्ये निस्वार्थीपणाची भावना महाविद्यालयीन स्तरावर निर्माण होते व त्यामुळे आयुष्यात त्या विद्यार्थ्यांचा व समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा 52 वा वर्धापन दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. रसाळ बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा संचालक, राष्ट्रीय सेवा योजना डॉ. महावीरसिंग चव्हाण उपस्थित होते.

यावेळी हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू नॉट मी बट यू समजावून सांगितला. हळगाव कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून भविष्यात एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास होण्यासाठी स्वयंसेवकांमार्फत प्रयत्न केले जातील असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेचा मसुदा संस्कृत भाषेतून त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती सेवाभावी वृत्ती निर्माण व्हावी व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी विद्यार्थ्यांमध्ये असावी हे त्यांनी एका गीताद्वारे सांगितले.

यावेळी डॉ. मिलिंद अहिरे आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी समाजाच्या विकासासाठी कष्ट करण्याची सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपले काम तन मन धन लावून केले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला यश नक्की मिळते व आपल्या कामाचे समाधान होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामात कधीही हलगर्जीपणा करू नये. यावेळी डॉ. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची सर्व माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. कीर्ती भांगरे यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कधी झाली व राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश काय आहे याविषयी माहिती स्वयंसेवकांना दिली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या चिन्हाचा अर्थ समजावून सांगितला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या महेश जाधव, मंजिरी पाटील व संचीता नवले या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली पोंदे यांनी तर आभार सौ. अंजली देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. मनोज गूड, डॉ. प्रेरणा भोसले, सौ. सासवडे, श्री. अमृता सोनवणे व 100 पेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

Related Articles

Back to top button