कृषी

कृषि विद्यापीठाच्या संशोधनाने शेतकर्यांच्या उत्पादनात क्रांतिकारक बदल- कृषि मंत्री दादाजी भुसे

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : कृषि विद्यापीठाच्या विविध संशोधनाने शेतकर्यांच्या उत्पादनात क्रांतीकरक बदल घडून आले आहेत. त्यामुळे परिसंवादामधील तज्ञांचे मार्गदर्शन राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
कृषि विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सातमाने येथील डाळिंब उत्पादक शेतकरी रविंद्र पवार यांच्या शेतशिवारात आयोजित राज्यस्तरीय डाळिंब पीक परिसंवादात कृषिमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, सरपंच भगवान पवार, डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, राजेंद्र भोसले, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, शास्त्रज्ञ डॉ. सचिन हिरे, तालुका कृषि अधिकारी सुधाकर पवार (सटाणा), जगदिश पाटील (नांदगाव), कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्यभरातील डाळिंब उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले या पिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची प्रगती झाली आहे. डाळिंबासारख्या नगदी पिकामुळे शेतकर्यांची प्रगती होत असली तरी यावर येणारे तेलकट डाग, मर रोग, फुलगळसारख्या रोगांमुळे हे पीक अडचणीत येते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिली. फळपिक विमा योजनेमध्ये काही बदल करणे गरजेचे असून त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच डाळिंबावर मोठ्या प्रमाणात संशोधन होण्याच्या दृष्टीकोनातून राहुरी आणि लखमापूर येथील संशोधन केंद्रामध्ये आवश्यक साधनसामग्रीसाठी लागणारा निधी पुढील महिन्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. कष्टकरी शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिली. राज्यात कृषि माल प्रक्रियेला चालना देण्यासाठी कृषि आयुक्तालय, पुणे येथे स्वतंत्र कृषि व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी यावळी दिली.
यावेळी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विनय सुपे व डाळिंब रत्न बाबासाहेब गोरे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. सर्व प्रथम कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व डाळिंब कलशाचे पुजन करुन राज्यस्तरीय डाळिंब परिवंवादास सुरवात करण्यात आली. उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रमाची विस्तृत स्वरुपात माहिती दिली. तर शास्त्रज्ञ डॉ. सचिन हिरे, तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे व तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button