ठळक बातम्या
कृषि विद्यापीठचे तत्कालीन कुलसचिव कासार यांची अटक अटळ
बाळकृष्ण भोसले/ राहुरी :
विनयभंग, लाचलुचपतच्या दोन ठिकाणी झालेल्या कारवाईची टांगती तलवार कायम असतानाच राहुरी येथील अनुसूचित जाती जमातीच्या दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव व येवला येथील विद्यमान प्रांताधिकारी सोपानराव कासार यांची अटक अटळ मानली जात आहे.
दरम्यान औरंगाबाद खंडपीठात बाळासाहेब जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत जाधव यांच्या वतीने अॅड. सुनिता सोनवणे यांनी कायदेशीर लढाई सक्षमपणे लढून कासार यांचा तुरूंगवासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. न्यायालयाने कासार यांच्यावर ताशेरे ओढताना उच्च पदावरील सक्षम अधिकारीच जर असे गुन्हे करत असतील तर… असे म्हणून खंत व्यक्त केली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात कुलसचिव पदासाठी सोपान कासार यांची निवड बेकायदेशीरपणे झाली असल्याचे निवेदन बाळासाहेब जाधव यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांना दिले होते. तर जाधव हे कृषिमंत्री विद्यापीठात आले असताना त्यांना समक्ष भेटून निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव यांना कासार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली होती.
त्यापूर्वी जाधव यांनी चुकीच्या निवडीविरोधात निवेदन दिल्याने त्याचा राग मनात ठेवून जाधव यांना मानसिक त्रास दिला. त्यांना विद्यापीठात प्रवेश बंदी करण्यात आली. त्यांच्या विरोधात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या १० जिल्ह्यातील १७ अधिकार्यांना जाधव यांच्या विरोधात संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचे पत्राद्वारे आदेश दिले. व संबंधितांनी पोलीस ठाणे व न्यायालयात गुन्हे दाखल करून केसेस दाखल केल्या. दरम्यान जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधीत १७ अधिकार्यांनी आपआपल्या तक्रारी विनाशर्त मागे घेऊन तसे लेखी पत्र जाधव यांना दिले. १७ अधिकार्यांच्या विरोधात जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या. उच्च न्यायालयाने राहुरी पोलीसांना समन्स देऊन माहिती मागविली. याप्रकरणी संबंधीत १७ अधिकार्यांच्या विरोधात कारवाई अटळ असल्याची माहिती अॅड. सुनिता सोनवणे यांनी दिली.
दरम्यान जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात कासार यांच्या विरोधात अनुसूचित जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन जाधव यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात केला असून बदनामी केली. एवढी नौटंकी करूनही कासार यांची अटक अटळ ठरणार असल्याची माहिती अॅड. सुनिता सोनवणे यांनी दिली असून या कर्मचारी समन्वय संघाच्या विरोधात बाळासाहेब जाधव औरंगाबाद दाद मागणार असल्याचे अॅड. सुनिता सोनवणे यांनी सांगितले.
येवला येथे कार्यरत असताना कासार यांच्यावर चौकशीचा बडगा उभारून विशाखा समितीनेही त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील एका महिला तलाठीस मानसिक त्रास दिल्याने तेथे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संगमनेर व निफाड येथेही कासार यांच्या विरोधात लाचलुचपत पथकाने कारवाई केल्याने कासार यांची प्रशासकीय कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे.