अहिल्यानगर
कर्जत येथील युवा नेते पाटील यांचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा…
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : आज कर्जत येथील भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांचा 27 वा वाढदिवस इतर ठिकाणी साजरा न करता निवारा बालगृहातील अनाथ, निराधार मुलांना एक दिवसाचे गोड जेवण व पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा, धान्य देऊन साजरा केला आहे.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता- जामखेड जि-अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत व भटके-विमुक्त दलित आदिवासी या घटकातील 71 मुलांच्या शिक्षणासाठी हा प्रकल्प 2015 पासून लोकवर्गणीतून चालवला जात असून या प्रकल्पाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. यावेळी उपस्थित मान्यवरांचे बालगृहातील मुलांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले व गुलाबपुष्प शाल देऊन त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सागर पाटील बोलताना म्हणाले की मी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावरती काम करत असल्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करावे लागतात. तेव्हा मी अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवारा बालगृहाचे नाव ऐकून होतो. त्यामुळे मी माझा वाढदिवस या बालगृहातील अनाथ, निराधार यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलविण्यासाठी या ठिकाणी साजरा करण्याचे ठरवलेे. मी जेव्हा या बालगृहात प्रवेश केला तेव्हा मी हे पाहून एकदम आश्चर्यचकित होऊन भारावून गेलो. याठिकाणी निर्जीव वस्तूंना देखील बोलके बनवलेले आहे या बालगृहाची इमारत, परिसर स्वच्छता, पिण्यासाठी फिल्टर युक्त पाणी, व्यवस्थापन या मुलांची शिस्त त्यांच्यामधील कलागुण इत्यादी पाहून मी भारावून गेलो.
तसेच या संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी संस्थेची संपूर्ण माहिती सांगून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्निल खाडे, अनिकेत कुलकर्णी यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवारा बालगृहाचे प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण यांनी केले.
यावेळी महेंद्र पवार, कृष्णा वायकर, स्वप्निल निंबाळकर, धीरज निंबाळकर, शितीज वाईकर, बब्रुवान वराळे, मच्छिंद्र जाधव, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, मोरे ताई, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार निवारा बालगृहाच्या व्यवस्थापिका सौ. संगीता केसकर यांनी मानले.