साहित्य व संस्कृती

वारकरी संप्रदाय व वारी परंपरा

◾ वारकरी संप्रदायाचा उगम:     

भारतातील प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मय हे मुख्यतः सांप्रदायिक स्वरूपाचे आहे. या काळात कर्नाटकात वीरशैव पंथाचे प्रवर्तक बसवेश्वर यांनी लिंगायत समाजातील  जातीभेदाचे निर्मूलन करून आपले अनुयायी शिवभक्ती कडे प्रवृत्त केले. तर उत्तरेत रामनंदाच्या राम भक्तीला प्राधान्य दिले जात होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील श्री चक्रधर स्वामी, निवृत्तीनाथ ज्ञानदेव व रामदास हे सर्व थोर पुरुष कोणत्या ना कोणत्या संप्रदायाशी निगडीत होते. या काळात प्रामुख्याने महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय,  रामदासी संप्रदाय, नाथ संप्रदाय व वीरशैव संप्रदाय हे प्रमुख पाच संप्रदाय महाराष्ट्रात कार्यरत होते. तेराव्या शतकात श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे तर संत ज्ञानेश्वर भागवत धर्म संप्रदायाचे कार्य करत असताना किंबहुना त्यांच्या बरेच आधीपासून पंढरपूरच्या परिसरात एक नवा पंथ आकारास आला होता. त्याचे अधर्यु संत नामदेव होते. नामदेवाने आपल्या भक्तीने देवाला वश केले होते. असा त्यांचा बोलबाला असल्यामुळे त्यांच्याभोवती बहुजन समाजातील लोक गोळा झाले. पंढरपूरच्या वारी करणाऱ्या भक्तांचा हा  वारकरी पंथ. संत नामदेवांच्या या मेळाव्यात समाजातील अठरापगड जातीतील संत पुरुष व स्त्रिया समभावाने सामील झालेल्या होत्या. समाजातील कर्मठ पंडित व उच्चवर्णीय लोकांकडून उपेक्षित व त्रस्त अशा तळागळातील लोकांना भक्तिमार्गातून मोक्ष मार्ग दाखवणारा वारकरी पंथ हा एकमेव होता.

वारकरी संप्रदायाने कर्मठ चालीरीती, अंधश्रद्धा,रूढी यांना मूठमाती देऊन नवा संप्रदाय उभा केला.

” आयुष्य वैराग्य करी । तरी संकल्पाची सरी वारी।।” ज्ञा. (अ.६वा  ओवी ३७९९)

‘वारी करीन पंढरीची आवडी ही माझी साची’ संस्कृत ‘वारी’ या शब्दाचा अर्थ पाळी असाही एक अर्थ आहे ‘वार’ या संस्कृत शब्दावरून वारी हा शब्द मराठीत आला असावा असे अभ्यासकांचे मत आहे.

वारी:

आषाढी व कार्तिकी ची वारी नियमितपणे चालवणे ही वारकरी संप्रदायातील निष्ठेची गोष्ट आहे पंढरीची वारी देवाची वारी, तर आळंदीची वारी ही संताची वारी होय. या दोन्ही वाऱ्या वारकऱ्यांना प्राणभूत होत. वारी सांभाळण्यात काहीवेळा अत्यंत कसोटीच्या असतात त्या निष्ठावंत वारकरी प्राणपणाने सांभाळतो

“हीच माझी आस ।जन्मोजन्मी तुझा दास।। पंढरीचा वारकरी ।वारी चुको न दे हरी।।”

ही वारकऱ्यांची कळकळीची प्रार्थना असते आषाढ शुद्ध ११ हा पंढरीच्या वारीचा मुख्य दिवस. आषाढी आणि कार्तिकी एकादशीस पंढरपूरला लाखो भक्तांचा समुदाय एकत्र येतो

‘वारीकर’ या मूळ शब्दापासून वारकरी असा शब्द रूड झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. वारकऱ्यांचे प्रमुख कर्तव्य वारी करणे असे वारकरी मानतात.

“पंढरीची वारी आहे माझ्या घरी ।आणिक न करी तीर्थव्रत।।”

 किंवा

“पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे।। (तुकाराम गाथा. अभंग क्र. २२१७)

वारीचे महत्व या शब्दात वारकरी संप्रदायातील प्रमुख संत तुकाराम महाराज यांनी स्पष्ट केले आहे. आळंदीच्या वारीचा महत्वाचा दिवस कार्तिक वैद्य ११ हा असुन या दिवशी सगळे भागवत भक्त धर्माच्या ध्वजाखाली एकत्र येतात आणि  ‘भेदाभेद भ्रम अमंगळ ‘ मानून विठ्ठलाला आणि त्याच भावनेने इतर वारकऱ्यांना प्रेमाने आलिंगन देतात. वारकऱ्यांची समत्व भावना इथं प्रतिक रुप पावली आहे.

” म्हणोनी कुळजातीवर्ण। हे अवघेचीगा  अकारण।।”

या ज्ञानदेवांच्या उक्तीचा प्रत्यय या वैष्णवांच्या मेळाव्यात येतो त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात,

” वारकरी पायांपाशी ।आले त्यांसी विनविले।।”

तर संत नामदेव महाराज म्हणतात,

” पंढरीची वारी करील जो कोणी। त्याच्या चक्रपाणी मागेपुढे।।”

बहुसंख्य वारकरी पंढरीस आषाढीस जातात. वारकरी म्हंटला की त्याने एक तरी वारी केलेली असते. मग ती आषाढी असो वा कार्तिकीची असो त्या वारीस तो नियमाने जात असतो. वारीमध्ये अनेक लाभ पदरी पडतात. निष्ठा बळकट होते. अंतरीचा प्रेमभाव वृद्धिंगत होतो.

या वारीचे काही नियम आहेत हाती पताका घेऊन पंढरीस पायी गेले पाहिजे. वारकऱ्यांच्या पताकाचे महत्त्व सांगताना संतांनी म्हटले आहे.

” ऊंचे पताका झळकती टाळ मृदंग वाजती।” असे संत ज्ञानदेव म्हणतात तर संत सेना महाराज पंढरीचे माहात्म्य वर्णिताना म्हणतात

” पाहिला पंढरीमहिमा । दिंडी पताका नाही सीमा।। संत नाचती वाळवंटी । टाळ-मृदुंगाची आटी ।।”

वारीमध्ये मुखी नाम जय जय कार होतो. त्यामुळे भक्तांच्या पापांचे निर्दालन होते. त्यांचा उद्धार होतो. वैकुंठीचा राणा येथे विठ्ठलाचा अवतार धारण करून हीन दीन जनांना दर्शन देतो.

संत नामदेव म्हणतात.

” पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा । शेषा सहस्रमुखा न वर्णवेचि।।”

” पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोजन्मी वारी घडली जया ।।”

याप्रमाणे सर्वच संतांनी पंढरीच्या वारीचे महत्त्व वर्णिलेले आहे.

चंद्रभागेत स्नान:

नित्यनेमाने वारी करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये चंद्रभागे विषयी देखील प्रेम आहे. वारकरी पंढरपुरला गेल्यानंतर सर्वप्रथम चंद्रभागे स्नान करतो व नंतर पुंडलिक पायरीचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. चंद्रभागेत स्नान केल्याने मोक्षप्राप्ती मिळते असे वारकऱ्यांचे मत आहे. चंद्रभागे विषय संत तुकाराम महाराज म्हणतात.

” पंढरी पुण्य भूमि भीमा दक्षिणवाहिनी। तीर्थ हे चंद्रभागा महा पातका धुनी।।”(अभंग क्र.४१३५)

संत तुकाराम महाराज म्हणतात की, पंढरी हे पुण्यभूमी धर्म क्षेत्र आहे व तेथे भीमा हे तीर्थ दक्षिणमुखी वाहात असून चंद्र आकाराचे आहे आणि या ठिकाणी स्नान केल्यानंतर आयुष्यातील महा पातके धुऊन टाकण्याचे सामर्थ्य या चंद्रभागेच्या स्नाना मध्ये आहे. अशाप्रकारे चंद्रभागेत स्नान करण्याचे अनन्य साधारण महत्व वारकऱ्यांमध्ये आहे.

पुंडलिक व पांडुरंग यांचे दर्शन:

वारीला गेलेला प्रत्येक भक्त चंद्रभागे स्नान करतो. पुंडलिकाचे दर्शन घेतो व नंतर पांडुरंगाचे दर्शन घेतो.

” पंढरीशी जारे  आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ।।

वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ।। मागील परिहार पुढे नाही सीण । जालिया दर्शन एक वेळा ।।

तुका म्हणे नेणे अनेकांचे हाती । बैसला तो चित्ती निवडेना ।।(अभंग क्र.२२१९)

संत तुकाराम महाराज म्हणतात की जन्म-मरणाच्या उपाधीत सापडलेल्यांना  तुमची पांडुरंग विटेवर उभा राहून वाट पाहत आहे. त्याला भक्ताच्या भेटीची आवडी आहे. हे एवढेच नव्हे तर भक्तांना भेटण्यासाठी तो उतावीळ होतो. त्या पांडुरंगाचे एकदा जरी दर्शन झाले तरी मागील संचिताची निवृत्ती होते.  व पुढे होणाऱ्या क्रियामान कर्माचे कष्टप्रद फळ भोगावे लागत नाही. अशा प्रकारे पुंडलिक व पांडुरंगाच्या दर्शनाला वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व आहे.

प्रदक्षिणा:

वारीस आलेला प्रत्येक भक्त पंढरपुरातील विविध मंदिरे व अन्य पवित्र स्थाने यांची दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही वेळ व गर्दी यांचे तारतम्य पाहून ही प्रदक्षिणा तो पूर्ण करतो. यापैकी छोट्या प्रदक्षिणा देव प्रदक्षिणा असे म्हणतात तर मोठ्या प्रदक्षिणेस नगर प्रदक्षिणा असे म्हणतात

देव प्रदक्षिणा घालताना भक्त महाद्वार घटापासून आरंभ करतो आणि पुंडलिक मंदिराकडे जाऊन पुढे दत्तात्रय काळा मारुती इत्यादीचे दर्शन घेतो. शेवटी तो उद्धव घाटाची फेरी पूर्ण करतो. अशा रीतीने विठ्ठल मंदिर आणि त्याच्या परिसरातील सर्व मंदिरे याचे दर्शन पूर्ण होते.

नगर प्रदक्षिणा त्या मानाने मोठी असते भक्त प्रथम महाद्वार घाटाजवळ चंद्रभागेत उतरतो, पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतो आणि होडीतून विष्णुपद मंदिराकडे जातो. त्यानंतर नारद, अनंतपूर, महादेव, गोपाळपुरी ,पद्मावती, लखाबाई, इत्यादीचे दर्शन घेऊन तो महाद्वार घाटाकडे येतो. अर्थात यात्रेस फारच गर्दी असली तर या प्रदक्षिणा पूर्ण होत नाही पण वारीस आलेला कोणताही भक्त कोणत्याही परिस्थितीत विठ्ठल, पुंडलिक व गोपाळपुरी या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही.

वारी बरोबरच वारकऱ्यांना भजन, किर्तन, हरिपाठ, एकादशी व्रत, तुळशीची माळ हे देखील अत्यंत प्रिय आहेत.

आषाढी वारीच्या वेळेस ग्रीष्म ऋतू संपलेला असतो. त्याची ती उष्णता जिवघेण्या एवढी असते. त्या उष्ण कालात वारकरी पंढरीरायाच्या भेटीस पायी वारीला निघालेला असतो. त्याचे कारण वारकऱ्यांला विठूरायाच्या भेटीची आर्तता लागलेली असते. त्यामुळे संपदा सोहळा आवडत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात,

” संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ।।

जावे पंढरीसी आवडे मनासी। कधी एकादशी आषाढी हे ।।”(अभंग क्र.२६२६)

पंढरीनाथाला  भेटल्याशिवाय वारकऱ्यांचे मन शितल होत नाही. हीच वारकऱ्यांची तपश्चर्या आहे मस्तकावर सूर्यग्रहणाचे लोटातुन आग ओकतो पण वारकऱ्यांच्या हृदयात भगवंताच्या भेटीची आर्तता असल्यामुळे त्याला ते उष्ण किरण शीतल वाटतात.

पावसाच्या सरी वारकरी दिंडीला न्हाऊ घालतात. तरीसुद्धा वारकरी न थांबता सारखे भजन करीत चालत राहतात ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे दिंडी पाहिल्यावर खरोखर खरे वाटते. एकनिष्ठ वारकरी भौतिक निसर्गाला न जुमानता त्याच्याबरोबर मैत्री करून विठू माऊलीच्या भेटीसाठी आतुर होऊन धावतो, बागडतो त्याचा उत्साह कमी न होता अधिकच वाढत जातो. वर्षा काळातील सरिते प्रमाणे  वाढती श्रद्धा भक्तांची असते त्या श्रद्धेला मोक्षाचे निश्चित फल आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात

‘ पंढरीचे वारकरी। अधिकारी ते मोक्षाचे।।’

वारकऱ्यांना वारीला जात असताना दिवे घाटातून दिव्य प्रवास करावा लागतो पण माऊली माऊली च्या जयघोषात दिवे घाट कधी पार होतो हे वारकऱ्यांना समजत देखील नाही.

थोडक्यात वारकरी संप्रदायातील संप्रदायाने महाराष्ट्रीय समाजाला नवा विचार दिला नवी जीवननिष्ठा दिली विविध मानवी मूल्यातील समतोल व समन्वय साधून मराठी माणसाचे संरक्षण, संवर्धन केले ज्ञानदेवांनी अध्यात्मिक लोकशाहीचा पाया रोवून समानता व मानवता या मूल्यांना आधार दिला. नामदेव, एकनाथ, संत तुकाराम यांनी या मूल्यांना प्रत्यक्ष आचरणाने अनुभव जनसामान्यात ही मुल्ये रुजवण्यात वारकरी संप्रदायाने अथक प्रयत्न केले. जातिभेद हा भक्तीच्या माध्यमातून दूर केला. वारीच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र ढवळून निघतो महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यातील तसेच इतर देशातील नागरिकही या दिव्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी माऊलींच्या वारी सोबत पायी पंढरपूर पर्यंत चालत असतात. मागील दोन वर्षापासून covid-19 या जागतिक महामारी मुळे प्रशासनाने वारी बंद करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. त्याला वारकरी संप्रदायाने संपूर्ण पाठिंबा देऊन आपल्यातील सहिष्णु भाव दाखवून दिला. तसेच डॉक्टर ,पोलीस ,आरोग्य सेवेतील इतर कर्मचारी यांच्यातच प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतले व लवकर ही महामारी जाऊन जगावरील संकट टाळून सर्व मानव जात पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने नांदू दे असे साकडे वारीला न जाता ही आपापला घरूनच पांडुरंगास घातले अशाप्रकारे वारीचे महत्व प्रस्तुत शोधनिबंधात घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे

संदर्भ ग्रंथ:

१) ‘वारकरी पंथाचा इतिहास’ शं. वा. दांडेकर

२) ‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ प्रा. गं.बा. सरदार

३) सार्थ तुकारामांची गाथा, प्रा. गोपाळराव बेणारे.

संपादन : विजय चिडे: पाचोड

लेखक : प्रा.डॉ. संतोष चव्हाण..

मराठी विभाग प्रमुख शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड ता. पैठण जि. औरंगाबाद.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button