कृषी
शाश्वत कृषि विस्तारासाठी समन्वय गरजेचा- डॉ. व्ही.व्ही. सदामते
राहुरी विद्यापीठ : कृषि विस्तार सेवा ही पारदर्शक, प्रभावी आणि शेतकर्यांच्या गरजेवर आधारीत असावी. राज्य-केंद्र-स्वयंसेवी संस्था व खाजगी संस्था यांच्या एकत्रित समन्वयाने कृषि विस्ताराचे प्रभावी प्रारुप (मॉडेल) गरजेचे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कृषि विस्तार तज्ञ तथा माजी सल्लागार, कृषि, नियोजन आयोग, भारत सरकार डॉ. व्ही.व्ही. सदामते यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजीत कृषि विस्तारासाठी नाविन्यतेचे मार्ग या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. सदामते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे होते. याप्रसंगी डॉ. सदामते पुढे म्हणाले की कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, कृषि महामंडळे, स्वयंसेवी संस्था, समाज माध्यमे व प्रसिध्दी माध्यमे यांचे योगदान सातत्याने कृषि विकासामध्ये असल्याने देश अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. यापुढे शाश्वत कृषि विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि उद्योजकता, विपणन माहिती तंत्रज्ञान व समाज माध्यमांचा प्रभावी अवलंब होण्यासाठी कृषि विद्यापीठांनी नेवृत्वाची भूमीका बजावणे गरजेचे आहे. कृषि विस्तारात संशोधन महत्वाचे असून हवामान बदलावर आधारीत तंत्रज्ञान, शेतकर्यांचे सामाजिक-आर्थिक सबलीकरण, कृषि उद्योजकता या बाबींचा विस्तार संशोधनात समावेश करावा.
या प्रसंगी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराच्या वेळी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विभागीय व जिल्हा विस्तार केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे येथील शास्त्रज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. सदामते यांनी सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. गोरक्ष ससाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मनोहर धादवड व डॉ. ज्ञानदेव फराटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी डॉ. सुनिल भणगे, डॉ. पंडित खर्डे, डॉ. गोकुळ वामन, डॉ. भगवान देशमुख, डॉ. सचिन सदाफळ व विद्यार्थी उपस्थित होते.