अहमदनगर
गावमातीला विषमुक्त करण्यासाठी जैविक इंधननिर्मितीची शेतमळे उभारणार-रंजित दातीर
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : देशात अन्नधान्यनिर्मिती आणि दूधनिर्मिती या दोन क्रांत्या झाल्या. परंतु परकीय रासायनिक चक्रव्यहूत आपली गावमाती, हवा, पाणी, अन्न, आकाश, प्रकाश सर्वच विषारी झाल्यामुळे आपण रोगराईने त्रस्त आहोत. यासाठीच श्रीरामपूर जीतशार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गावमातीला विषमुक्त करण्यासाठी जैविक इंधननिर्मितीचे शेतमळे गावोगावी फुलविणार असून त्यासाठी कृषीप्रेमी आणि आरोग्यप्रेमी ग्रामस्थांनी कंपनीचे सभासद व्हावे असे आवाहन जीतशार फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष रंजित दातीर यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथील बरड वस्तीवरील श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसरात आयोजित गावकरी मेळाव्यात अध्यक्ष भाषणात रंजित दातीर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ञ डॉ. बबनराव आदिक, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे, संदीप दातीर, धनंजय काळे व्यासपीठावर उपस्थित होते. संयोजक काशिनाथ थोरात यांनी स्वागत केले तर माळेवाडी येथील माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे यांनी प्रास्ताविकेतून आजची शेती आणि शेतकऱ्यांची विदारक अवस्था वर्णन करून यातून बाहेर पडायचे असेल तर दातीर यांच्या हाकेला आपण धावून गेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले की, आता आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. 1947 पासून आपण लोकशाही विकास आणि जीवनसुरक्षा शोधत आहोत, आज गाव, शेती, शेतकरी, माणसांचे जीवन गलितगात्र झाले आहे, आता राजकारणापेक्षा आरोग्य, शिक्षण, आपलं जीवन आणि निसर्ग यांना जपलं पाहिजे, त्यासाठी जैविक इंधननिर्मिती आणि अन्नधान्य विषमुक्त झाले पाहिजे, यासाठीच या एमसीएल चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. डॉ.बबनराव आदिक यांनी आपल्या भूतकालीन, वर्तमानकालीन वातावरणाचे विस्तृत विवेचन करून सांगितले की, आपण अशीच विषारी प्रगती केली तर 50 वर्षात पृथ्वीवर माणूस दिसणार नाही,आज आपले जगणे महत्वाचे झाले आहे, हवा शुद्ध नाही, माती, पाणी, आकाश शुद्ध राहिले नाही यातून बाहेर पडा आणि निसर्गयुक्त इंधननिर्मितीला आणि आपल्या अर्थकारणाला योग्य न्याय हवा असेल तर जीतशार कंपनीचे सभासद व्हावे नाहीतर काळ कठीण आहे असे सुचविले, रंजित दातीर यांनी गिन्नी गवताचे उत्पादन आपणास भरपूर उत्पन्न देईल, शुद्ध खते, शुद्ध अन्नधान्य, फळे, जगणे सोपे होईल, गावातील बेरोजगारी नाहीशी होईल, आपले रस्ते, आपला गाव स्वच्छ आणि समृद्ध होण्यासाठी जैविक इंधननिर्मितीचे मळे फुलविणे हीच विकासाची वाट असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच निलेश चोरमल, उपसरपंच नवनाथ पवार, पोलीस पाटील रंगनाथ चोरमल, वसंतराव पवार,भाऊसाहेब चोरमल,नारायण खुरूद, नारायण बडाख, शशिराज वानखेडे,रंगनाथ पवार, जमादार शेख, लक्ष्मणराव दातीर, साहेबराव चोरमल, वाल्मिक बडाख,राजेंद्र बडाख, अशोकराव चोरमल, वेणुनाथ दहीरे, प्रमोद पवार, हरिभाऊ खुरूद, नानासाहेब घोगरे, सचिन चोरमल, रंभाजी महांकाळे, निवृत्ती चोरमल आदी उपस्थित होते. रंजित दातीर यांनी शेतकरी प्रश्न ऐकून त्यांच्याशी समाधानकारक चर्चा केली. काशिनाथ थोरात यांनी आभार मानले.