प्रासंगिक
शेतकऱ्यांच्या अंतःकरणातील वेदनांचा पंचनामा कोण करणार?
राज्यातील अनेक भागात सध्या अतिवृष्टी होत आहे याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.अतिवृष्टी, गारपीठ, दुष्काळ, चक्रीवादळ,महापूर अशा अनेक निसर्गाच्या लहरीपनाच्या संकटाचा शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो.परिणामी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेला शेतमाल एका क्षणात जमीनदोस्त होतो यापेक्षा दुसरा मोठा कोणता संघर्ष असूच शकत नाही.संघर्ष हा नेहमीच त्याच्या पाचवीला पुजलेला असतो तथापि संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेच शेतकरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.आता सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या असून महागाईचा आगडोंब झाला आहे मात्र शेतमाल व दुधदराचे बाजार हे वाढण्याऐवजी कमी होतात हिच खेदाची गोष्ट आहे.त्याने मार्केटला शेतमाल पाठवला तरी मोटार भाडे, हमाली,तोलाई,सर्व खर्च शेतकऱ्याकडून वसुल करायचा,व्यापाऱ्याने आपल्या मर्जीने विकायचा,व गिऱ्हाईकाने परवडेल त्या भावात खरेदी करायचा. त्याने सर्व घटकांना पोसण्याचा मक्ता घेतला आहे ना… आता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी देखील आंदोलन, निवेदन द्यावे लागतात तेंव्हा कुठे व्यवस्थेला जाग येते व मग नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येतात.मग नियम व अटींची यादी तयार होते व नंतर पुन्हा कोणी आंदोलन, निवेदन दिले कि मग ती मदत शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
कधी-कधी तर सरकारला आपण शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती याचाही सरकारला चक्क विसर पडतो ही वस्तुस्थिती आहे.संबंधित विभागाने मात्र हे पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याने हे पीक उभं करण्यासाठी किती खर्च केला, किती संघर्ष केला,किती कष्ट केले, किती कर्ज काढलं या गोष्टी कोणीच विचारत नाही हिच निष्क्रिय व्यवस्थेबाबद खरी शोकांतिका आहे.पंचनामेही सरकार करणार व हेक्टरी किती मदत द्यायची हे देखील सरकारच ठरवणार हा कसला पंचनामा?त्याने किती रात्री डोळ्यात तेल घालून हिंस्र प्राण्यांना तोंड देत पिकांना पाणी दिले,खतांचा तुटवडा असला कि दिवसभर उन्हा-तान्हात तो दुकानातसमोर लाईनमध्ये किती वेळ उभा राहिला? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एवढं सर्व सहन करूनही खुप नेटाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्याच्या नशीबी नेहमीच अंधार…त्याच्या अंतःकरनातील वेदनांचा पंचनामा करण्याची खरी वेळ आता आली आहे…!
बाळासाहेब भोर
अ. भा. क्रांतीसेना, संगमनेर