अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजारांची मदत द्या
विलास लाटे/पैठण : मागील आठवड्यात महाराष्ट्रासह पैठण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे न करता सरसकट पन्नास हजारांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष साईनाथ लंभाडे यांनी (दि.१) रोजी पैठणचे तहसिलदार यांना मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवड्यात आलेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह पैठण तालुक्यात ढगफुटी सदृष्यपाऊस झाल्याने पावसाचे पाणी शेतात साचून, शेतीला तळ्याचे स्वरुप आले आहे. पावसाने तालुक्यातील तुर, कापुस, मुग, उडीद, सोयाबीन, फळबाग आदी शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील महसुल मंडळात आता पर्यंत ७०० मी.मी.च्या वर पाऊस झाला आहे. कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला आता ओल्या दुष्काळाचाही सामना करावा लागत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांत कमालीची अस्वस्थता पसरुन शेतकरी चिंतातूर झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून धीर देणे गरजेचे आहे. नसता शेतकरी देशोधडीला लागेल. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढेल. या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे कोणतेही पंचनामे न करता तात्काळ सरसकट पन्नास हजार सरकार कडून मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष साईनाथ लंभाडे यांनी पैठण तहसिलचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.