अहिल्यानगर
फिरते विद्यापीठ काळाच्या पडद्याआड
प्रसंग आहे 52 वर्षापूर्वीचा. पितळाच्या तांब्याभर चहा मिळाला नाही म्हणून माझा राग अनावर झाला होता. रागाच्या भरात खिडकीचा बारदाना जाळला. तेवढ्यावरच राग थांबला नाही. बैलगाडीसाठी असलेले पाच लिटर वंगन अंगावर ओतून घेतले. माझी अवस्था बघून मी याला कोल्हारला शिक्षणासाठी घेऊन जातो असे मामांनी आईला सांगितले.
🏍️आपण मोटरसायकलवर भूर कोल्हार ला जाऊ असे मामा म्हणताच मी जावा कंपनीच्या मोटरसायकल जाऊन बसलो. त्याकाळी मोटर सायकलीवर बसण्यासारखा मोठा आनंद कोणताही नव्हता. राहुरीच्या धावडे पेट्रोल पंपावर दीड रुपयाचे मामांनी मोटर सायकलमध्ये पेट्रोल टाकले. कोल्हार ला पोहोचल्यानंतर दुसर्या दिवशी पहाटेच उठावे लागले. मामांनी चहा ऐवजी पितळाच्या तांब्या भरलेल दूध माझ्या हातात दिले. हाक ना बोंब ह्या उक्तीप्रमाणे मी तेवढेही दूध घशाच्या खाली लोटून दिले.
🏡मामांनी मला कापसे वस्ती शाळेत दाखल करून नाव नोंदणी केली. कष्ट, प्रामाणिकपणा, धाडस, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, नियमित व्यायाम आदी शेकडो संस्कार मामांनी दिले. त्यावेळी मामांकडे मावस बहीण हिराबाई, मथुराबाई व मावस भाऊ रोहिदास अशी आमची टीम तयार झाली होती. सत्य असेल तर कुणालाही घाबरायचं नाही असच सूत्र मामांनी आम्हाला शिकवलं. भाषणा पासून तर अनेक उपक्रमांमध्ये मला कोल्हारच्या भूमीत सहभागी होता आलं. शेती, अध्यात्म, सहकार, सामाजिक क्षेत्रामध्ये मामांचा वावर होता. गेल्या वीस पंचवीस वर्षां पासून मामांनी अनेक जणांची व्यसने सोडली.
🏥 वीस वर्षांपूर्वी मामांच डवले हॉस्पिटलमध्ये मोठ ऑपरेशन झालं होतं. तरीदेखील मामांनी लाखो किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवरून केला. मागच्या महिन्यामध्ये मामा मोटरसायकल घेऊन राहुरीला घरी आले. माझं मोटरसायकलवरून तुम्हाला हे शेवटच भेटण आहे. यापुढे तुम्ही मला भेटायला यायचं अशी समज मामांनी दिली. गेल्या आठवड्यात मामांना भेटायला गेलो होतो. मामा गेल्याचे फोन आला आणि मन सुन्न झालं.
👨👨👧👧आयुष्यभर मामांनी लाखो माणसं जोडली. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी होण्यासाठी साठ वर्षांत कित्येक लाख किलोमीटरचा प्रवास केला असेल. सुखदुःखात सहभागी होताना मामाने मोठ्या प्रमाणावर मित्र जोडले. मामांच्या पहाडी आवाजापुढे अनेकांची विकेट उडत असे. ते स्पष्टपणे बोलले की कोणालाही राग येत नसे. मला भेटावं आणि बोलावं तेवढी त्यांची अलीकडच्या काळातील अपेक्षा असे.
👳♀️खरंच पूर्वीची माणसं साधी सरळ आणि प्रेमळ होती. मामा नावाचे हे विद्यापीठ आयुष्यभर पायात भिंगरी असल्याप्रमाणे फिरत राहिलं. माझ्याबरोबर पांडुरंग आहे; त्यामुळे भीती कसली? असा बाणा असलेल्या म्हणून मामांना भावपूर्ण आदरांजली!💐💐💐
🖋️भाऊसाहेब येवले
(कोल्हार येथील रामाजी कृष्णाजी राऊत( मामा )यांचे बुधवारी पहाटे निधन झाले; त्यानिमित्त श्रद्धांजलीपर लेख……✍️)