अहिल्यानगर
साकुर पठार भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत शिवप्रतिष्ठाण आक्रमक…जिल्हा प्रशासनाला निवेदन…
संगमनेर शहर/ आशिष कानवडे : साकुर पठार भागातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. शेतकऱ्यांना माल वाहतूक करण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत असल्याने येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली आहेत.
संगमनेर तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात रणखांब फाटा ते दरेवाडी, साकुर ते नांदुरखंदरमाळ (जांबुत मार्गे), साकुर ते बिरेवाडी फाटा (१ किमीचे नवीन डांबरीकरण २ महीन्यात खड्डेमय ईतर सर्व रस्ताच खड्डेमय-४किमी ), मांडवे बुद्रुक ते वरवंडी या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. जनसामान्यांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील, संगमनेर तालुका संघटक शिवश्री. गणेशजी श्रीराम, युवानेते निलेशजी मनसुक, डॉ.अजीत गुळवे तसेच ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
दैनंदिन जिवनात खड्डेमुक्त रस्ते काळाची गरज आहे. दळणवळणासाठी रस्ते हेच पठारभागाचे मुख्य स्त्रोत असल्याने शेतकऱ्यांना मालवाहतूक, खते-औषधे आणण्यासाठी तसेच प्रवास करताना नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली जात नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी केले.